Monday, December 1, 2014

नवे मन्वंतर


भाजपाची सभासद नोंदणी सुरू झाली आहे. १ नोव्हेंबरपासून पंतप्रधान नरेंद्र मोदींनी राष्ट्रीय अध्यक्ष अमित शाह यांच्याकडून सदस्यत्व स्वीकारले आणि मोहीम सुरू झाली. गेल्या एक महिन्यात देशभरात एक कोटी सभासद नोंदणी झालेली आहे. यापूर्वीची सभासद नोंदणी सहा वर्षांपूर्वी झाली होती. त्यावेळी देशात तीन कोटी सभासद नोंदवले गेले होते. यावेळची सभासद नोंदणी सर्व अर्थाने वेगळी आहे. गेली साठ वर्षे वापरात असलेली पद्धती बाजूला ठेवून भाजपाने नव्या तंत्रज्ञानाचा वापर करत सभासद नोंदणीची नवी पद्धती स्वीकारली आहे. भारताच्या राजकीय जीवनातील हा एक अनोखा प्रयोग आहे. आणि या प्रयोगामुळे केवळ भाजपाच नव्हे तर भारताच्या राजकारणातील सर्व राजकीय पक्षांना आपली कार्यपद्धती बदलावी लागेल, एवढा दूरगामी परिणाम करणारा हा प्रयोग आहे.

आजपर्यंत पारंपरिक पद्धतीने नोंदणी करताना पक्षाचे कार्यकर्ते लोकांकडे जात असत किंवा लोकांकडे गेलो होतो असा आभास तरी निर्माण करत असत. यावेळी भाजपाने स्वीकारलेल्या पद्धतीत कार्यकर्ते लोकांकडे जातीलच पण पक्षाचे सभासदत्व घेण्याची इच्छा असलेल्या व्यक्तीला थेट सभासदत्व घेता येईल, जे पारंपरिक पद्धतीत फारसे सोपे नव्हते. हे एक नवे वळण या पद्धतीने दिले. सभासदत्व स्वीकारण्याचे आवाहन जनतेला केल्यानंतर एक नोव्हेंबरला काही तासांमध्ये देशाच्या कानाकोपऱ्यातून साडेसात लाखाच्या वर नोंदणी झाली हा एक अनोखा अनुभव होता.

१९५१ साली जनसंघ स्थापन झाला तेव्हा त्या जनसंघाचे सभासदत्व स्वीकारायला कोणीच तयार नव्हते. तो काळ अवघड होता. महात्मा गांधी यांचा खून झाला होता. काँग्रेसच्या नेतृत्वाखाली ब्रिटिशांविरुद्ध दिलेला लढा ताजा होता. त्या आंदोलनात सहभागी असलेली काँग्रेसच्या नेतृत्वाची पिढी सर्व पातळीवर नेतृत्व करत होती. नेहरूंचे उत्तुंग नेतृत्व होते. त्यामुळे कोणताही नवा विचार आणि त्यातही ज्याच्या तोंडावर गांधी खुनाचे काळे फासण्याचा प्रयत्न झाला असा विचार जनतेपर्यंत घेऊन जाणे हेच सर्वात मोठे धाडस होते. त्यामुळे १९५१ ची परिस्थिती तर कल्पनेच्या पलिकडची होती. पण भारतीय जनता पार्टी १९८० साली स्थापन झाली तेव्हाची परिस्थितीही फारशी वेगळी नव्हती. १९७० च्या दशकात राजकीय भ्रष्टाचाराच्या विरोधात सुरू झालेले विद्यार्थ्यांचे नवनिर्माण आंदोलन, जयप्रकाशजींचे नेतृत्व, आणीबाणीच्या विरोधातील संघर्ष आणि जनता पार्टीचे अल्पजीवी सरकार यामुळे पूर्वाश्रमीच्या जनसंघाची राजकीय अस्पृश्यता संपलेली होती. पण म्हणून विचार प्रतिष्ठित झाला होता, विचारांची स्वीकारार्हता वाढली होती, असे म्हणण्यासारखी परिस्थिती नव्हती. जनता पार्टीतून बाहेर पडून भाजपाची स्थापना केल्यानंतर पुनःश्च हरीओम म्हणत एका अर्थाने शून्यातूनच सुरुवात केली होती.

१९८० पासून २००९ पर्यंत वेगवेगळे प्रयोग करत वेगवेगळी आंदोलने करत पक्ष वाढविण्याचा, पक्षाचा पाया विस्तारत नेण्याचा प्रयत्न आम्ही सर्वांनी केला. त्या प्रयत्नांना यश मिळाले खरे, पण ते नाही म्हटले तरी मर्यादित होते. एक तर देशाच्या सर्व भागात पक्ष बळकटपणे उभा राहिला नाही. दक्षिणेतील तीन प्रांत आणि पूर्व – पूर्वोत्तर भारत यात पाय रोवण्यात पक्षाला याही काळात यश मिळत नव्हते हे नाकारण्याचे कारण नाही. २०१२ नंतर देशातील राजकीय चित्र झपाट्याने बदलत गेले. गुजरात, मध्य प्रदेश, छत्तीसगड असे काही मोठे प्रदेश आम्ही सातत्याने जिंकले. या प्रदेशांमधील आमच्या सरकारांनी खरोखरच प्रभावी कामगिरी करून दाखवली. विशेषतः संपूर्ण देशाची अर्थव्यवस्था कोसळत असताना व विकासाचा गाडा अडचणींमध्ये रुतलेला असताना या तीन राज्यांनी शेती, औद्योगिक व सामाजिक क्षेत्रात चालवलेली प्रगती ही स्वाभाविकपणे लोकांच्या आकर्षणाचा विषय बनली. संपूर्ण देशात विशेषतः केंद्रात व महाराष्ट्रात राजकीय भ्रष्टाचाराची प्रचंड प्रकरणे पुढे येत असताना भाजपाशासित तीन राज्यांमध्ये म्हणण्यासारखा भ्रष्टाचार नाही, हेही जनतेच्या लक्षात येत होते. या सगळ्यातून सर्वसमावेशक विकासासाठी लागणारा चांगला राज्य कारभार करण्याची कुवत भाजपामध्ये आहे, असे एक जनमानस बनत गेले. त्याच्या जोडीला नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाचा उदय झाला. अनंत अडचणी व प्रखर विरोध या सगळ्यांना तोंड देत देत त्यांनी गुजरातची जी प्रगती करून दाखवली, ती देशभर आकर्षणाचा विषय झाली. अन्य सर्व राजकीय नेतृत्वाच्या तुलनेत नरेंद्र मोदींचा ठसा अधिक प्रभावीपणे उमटायला लागला. आणि त्यांच्या नेतृत्वाखालील भाजपाची स्विकारार्हता अकल्पित वेगाने वाढू लागली. पूर्वी दारोदार जाऊन सुद्धा सभासद मिळत नव्हते. त्याच्या उलटा प्रवाह सुरू झाला. लोक आपणहून पक्षाच्या कार्यालयात येऊन सभासदत्व मागू लागले.

१९४७ नंतरचा पाच सात वर्षांचा कालखंड असा होता की, लोक आपणहून काँग्रेसचे सभासदत्व मिळावे यासाठी प्रयत्न करत होते. पश्चिम बंगाल, केरळमध्ये काही काळ कम्युनिस्टांच्या बाबतीत हे घडत होते व अण्णा हजारेंच्या आंदोलनानंतर दिल्लीसारख्या शहरामध्ये आम आदमी पार्टीबद्दल असे आकर्षण अल्पजीवी का होईना पण निर्माण झाले होते. पण देशाच्या कानाकोपऱ्यातून आज भाजपाला मिळत असलेला प्रतिसाद हा सर्वस्वी वेगळा आहे. त्याची तूलना फार तर स्वातंत्र्यानंतर काँग्रेसबद्दल असलेल्या आकर्षणाशीच करता येईल. चाळीसच्या दशकामध्ये स्वराज्य मिळविण्यासाठी जनता काँग्रेसबरोबर होती. आता सत्तर वर्षानंतर समर्थ, संपन्न आणि आत्मनिर्भर समाज निर्माण करण्याची आकांक्षा बाळगणारी जनता सुराज्य व चांगल्या राज्यकारभाराच्या अपेक्षेने भाजपाबरोबर येत आहे. भाजपाची सध्या सुरू असलेली सभासदनोंदणी व तिला मिळणारा प्रतिसाद नव्या मन्वंतराचा निदर्शक आहे.

Sunday, November 23, 2014

आम्ही सुरुवात केली आहे!


विधानसभा निवडणूक निकालाला एक महिना झाला. अनेक घडामोडी घडल्या. आता नवी सत्ता समीकरणे तयार होतील, असा आभास निर्माण झाला. प्रत्यक्षात तसे घडले नाही.

महाराष्ट्राची ही विधानसभा निवडणूक ऐतिहासिक ठरली. त्यामध्ये जनादेशाचे संपूर्ण वैचारिक परिवर्तन दिसले. भारतीय जनता पार्टीला एक कोटी सत्तेचाळीस लाख मतांसह२७.८ टक्के मते मिळाली. शिवसेनेला १९.३ टक्के मते मिळाली. काँग्रेसच्या मतांचा वाटा १८ टक्के तर राष्ट्रवादी काँग्रेसचा १७.२ टक्के होता. याचे तात्पर्य ४७ टक्के मते काँग्रेसप्रणीत समाजवाद आणि सेक्युलॅरिझमच्या विरोधात गेली. निम्म्या महाराष्ट्राने राष्ट्रीय हिंदुत्वाची भूमिका स्वीकारली. महाराष्ट्राचा हा वैचारिक भूमिकेतील बदल मूलगामी आहे. परंतु, त्याची दखल राजकीय विश्लेषकांनी तशी घेतली नाही. प्रस्थापित राजकीय विश्लेषक स्वतःला पुरोगामी म्हणवतात. आपण जे बोलतो तोच समाजवाद आणि धर्मनिरपेक्षता असा त्यांचा गैरसमज आहे. य मंडळींना विधानसभा निवडणुकीच्या निमित्ताने समोर आलेले जनमताचे वास्तव अद्याप पचलेले नाही. त्यामुळे त्यांनी ते झाकण्याचा प्रयत्न चालवला आहे. विधानसभा निवडणुकीत जिंकलेल्या जागांचा हिशेब पाहिला तर भाजपाच्या १२३ व शिवसेनेच्या ६३ अशा १८६ जागा राष्ट्रीय हिंदुत्वासाठी काम करणाऱ्यांनी जिंकल्या. याचा अर्थ दोन तृतियांशपेक्षा अधिक महाराष्ट्राने काँग्रेसी छापाचा भोंगळ समाजवाद आणि ढोंगी सेक्युलॅरिझम नाकारला. जनादेशाचा हा अर्थ विस्ताराने चर्चेत आला पाहिजे.

आता सरकार स्थापन होऊन विश्वासदर्शक ठराव जिंकल्यानंतर आमची जबाबदारी वाढली आहे. त्याचे भान ठेऊन आमच्या सरकारने कामाला सुरुवात केली आहे. व्यावसायिक परवाने तीन दिवसात मिळाले पाहिजेत, यासारख्या प्रशासकीय सुधारणा सुरू झाल्या आहेत. सरकारी नोकरांच्या बदल्यांमधील राजकीय हस्तक्षेप टाळण्यासाठी पावले उचलली गेली आहेत. वर्षानुवर्षे जे अधिकारी मंत्रालयात मंत्र्यांच्या केबीनमध्ये अड्डे ठोकून बसले होते त्यांना बाहेर काढले आहे. कृषी उत्पन्न बाजार समित्यांची प्रशाकीय मंडळे बरखास्त करून त्यांच्या निवडणुका लोकशाही पद्धतीने घेण्याचा मार्ग मोकळा केला. महाविद्यालयीन निवडणुकांच्या बाबतीत निर्णय घेतला. असे एक ना अनेक महत्त्वाचे निर्णय अवघ्या पंधरा दिवसात घेऊन आमच्या सरकारने काम करायला सुरुवात केली आहे. आता कसोटी इतरांची आहे. वरील सर्व निर्णय किंवा येणाऱ्या दिवसांमध्ये घेतले जाणारे असे अनेक निर्णय हे महाराष्ट्रातील जनतेच्या फायद्याचे आहेत का नाही याचा विचार इतरांनी करायचा आहे. सरकारमध्ये सामील होणार की नाही यावर रोज छापा काटा खेळत बसलेल्या मंडळींनी त्यांना महाराष्ट्राचे भले कशात दिसते याचे उत्तर दिले पाहिजे. आम्ही महाराष्ट्राच्या विकासासाठी कामाला सुरुवात केली आहे. बरोबर यायचे की नाही याचा निर्णय इतरांनी करायचा आहे.

राज्यातील भाजपा सरकारचे यापुढचे पाऊल भ्रष्टाचारविरोधातील लढाई असेल. मागील सरकारमधील काही व्यक्तींनी केलेल्या भ्रष्टाचारावर कारवाईची भूमिका घेऊन आम्ही सत्तेत आलो. आता भ्रष्टाचारावरील कारवाई सुरू केल्यावर जे लोक विरोधात उभी राहतील किंवा अस्मितेच्या नावाखाली साथ द्यायला नकार देतील, ते सर्वजण मागील सरकारमधील व्यक्तींच्या भ्रष्टाचाराचे संरक्षक असतील.

Monday, November 17, 2014

शिवसेनेचे धरसोडीचे राजकारण, कोलांटउड्या आणि वैचारिक गोंधळ

महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीचा निकाल लागल्यापासून शिवसेनेने संधीसाधूपणाचे आणि सुडाचे राजकारण चालविले आहे. कोणतीही ठाम राजकीय भूमिका नाही अथवा विचारसरणीही नाही. खरे तर याच्यामध्ये मला काय मिळणार, अशीच विचारसरणी आहे. गेल्या काही दशकात महाराष्ट्राने अशा प्रकारचे राजकारण पाहिले नाही.

भारतीय जनता पार्टी – शिवसेनेची युती तुटण्यास शिवसेनाच जबाबदार आहे. एका जागेवरसुद्धा तडजोडीस तो पक्ष तयार नव्हता. आम्ही केवळ 119 जागा स्वीकाराव्यात असा त्यांचा आग्रह होता पण प्रत्यक्षात निवडणुकीत भाजपाने 123 जागा जिंकल्या. त्यांना स्वतःला 170 – 171 जागा ठेवायच्या होत्या पण निवडणुकीत मात्र त्यांना फक्त 63 जागांवर विजय मिळाला. इतका दारूण पराभव झाल्यानंतरसुद्धा त्यांच्या नेतृत्वाने जनतेचा मूड समजून घ्यायला नकार दिला.

निकालाच्या दिवशी सुद्धा आमचे प्रदेशाध्यक्ष आणि आता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पहिल्या दोन दोन तासातच स्पष्ट केले की, शिवसेना हा भाजपाचा नैसर्गिक मित्र आहे. भाजपाला बहुमत मिळाले नाही आणि युती करावी लागली तर आमची स्वाभाविक निवड शिवसेनाच असेल अशी आमची स्पष्ट भूमिका होती. पण आमच्या भूमिकेला प्रतिसाद देतानाही शिवसेनेची भूमिका हास्यास्पद होती. मुख्यमंत्रिपद देऊ केले तरच युतीचा विचार करू असे त्यांनी सांगितले. निवडणुकीत 65 पेक्षाही कमी जागा मिळाल्यानंतरसुद्धा त्यांची अशी भूमिका होती.

त्या दिवसापासून शिवसेनेने द्वेषाचे राजकारण केले. कधी मोदीजींच्या वडिलांचा उल्लेख केला तर कधी आमचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शाह यांना औरंगजेब अथवा अदिलशाह म्हटले. शक्य त्या प्रत्येक मार्गाने त्यांनी आम्हाला अपमानित केले. तरीही आता त्यांना आमच्याकडून राज्य सरकारमधील महत्त्वाची खाती आदरपूर्वक हवीत. आम्ही अफझलखान आणि आदिलशाह असू तर शिवसेना आमच्या सरकारमध्ये सामील होण्यास उत्सुक का आहे ?

सत्तेच्या आकांक्षेने ते पुरते आंधळे झाले आहेत. मतदारांनी झिडकारले तरीही आपणच महाराष्ट्राचे तारणहार आहोत, असे वलय स्वतःभोवती निर्माण करत आहेत. त्याचा अलिकडचा प्रकार म्हणजे राष्ट्रवादी काँग्रेसच्या पाठिंब्याबाबत आमची भूमिका काय आहे, असा जाब विचारणे. आम्ही राष्ट्रवादी काँग्रेसचा पाठिंबा कधीही मागितला नाही त्यामुळे आम्ही याबाबतीत खुलासा करण्यासारखे काही नाही. जेव्हा आम्ही राज्यपालांकडे प्रस्ताव सादर केला त्यावेळी आम्ही केवळ अपक्षांच्या पाठिंब्याचा उल्लेख केला होता व राष्ट्रवादी काँग्रेस कोठे चित्रातच नव्हती. एकतर शिवसेनेला हे समजत नाही किंवा हे समजून न घेताच तो पक्ष आमची बदनामी करत आहे. राजकीय परिपक्वता नसल्याचेच हे लक्षण आहे.

खरे तर गेले तीन चार दिवस शिवसेनेने राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांबरोबर मागच्या दाराने संपर्क साधत सरकार स्थापन करण्यासाठी गुप्तपणे चाचपणी करून पाहिली. विधानसभा निवडणुकीचे निकाल जाहीर झाल्यानंतर लगेचच त्यांनी सरकार स्थापनेसाठी काँग्रेसबरोबर हातमिळवणीचा प्रयत्न केला पण काँग्रेसनेच त्यांना नकार दिला. आता ते हाच प्रयत्न राष्ट्रवादी काँग्रेसबरोबर करू पाहत आहेत. पण बहुमताचे साधे अंकगणित तरी त्यांना कळते का ?

शिवसेनेचे नेतृत्व केवळ द्वेषाच्या आणि मत्सराच्या राजकारणात गुंतलेले आहे. एकीकडे ते महाराष्ट्राच्या हिताच्या गप्पा मारतात पण राज्याला स्थिर सरकार देण्याचा त्यांनी एकदाही विचार केला नाही. शिवसेनेच्या तर्कानुसार भाजपाने राष्ट्रवादी काँग्रेसबरोबर आघाडी केली तो मतदारांचा विश्वासघात आहे. पण जर शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस एकत्र आले तर मात्र ते महाराष्ट्राच्या हितासाठी असते. या दुटप्पीपणाचे ते काय स्पष्टीकरण देणार आहेत ? कधी स्पष्टीकरण देतील काय याची मला शंका आहे.

ज्या शरद पवारांच्या विरोधात तुम्ही इतकी गरळ ओकली आणि त्यांना हिंदुत्वाचा शत्रू ठरवले तसेच त्यांनी भगवा आतंकवाद हा शब्दप्रयोग करून हिरव्यांना पाठिंबा दिल्याचा आरोपही तुम्ही केलात ते अचानक तुमचे मित्र कसे झाले ? शरद पवारांबद्दल अवघ्या चोवीस तासात इतके मतपरिवर्तन कसे झाले ?

शिवसेनेचे राजकारण हे पूर्णपणे संधीसाधूपणाचे, दबावाचे आणि वैचारिक धरसोडीचे आहे. ते त्यांना भविष्यात महागात पडलेच पण त्यामुळे राज्याच्या राजकारणात एक दुर्दैवी आणि धोकादायक पायंडा पडणार आहे.